संगमनेर, प्रतिनिधी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते.
थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर अनेक ठिकाणी पाईप वापरून पाणी उचलण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे यासाठी नियोजन केले होते, मात्र सत्ता बदलामुळे कामात काही अडथळे आले.
असे असले तरी, ते सर्वांना पाणी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत आणि राज्यातील मंत्र्यांशी त्यांचे असलेले चांगले संबंध विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही, त्यांच्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच काम सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी संपतराव गोडगे यांनी चिंचोली गुरवमध्ये निळवंडे धरणाचे पाणी आल्याने शेतकरी व नागरिक आनंदी झाले असल्याचे सांगितले. कारखान्याने जेसीबी, पोकलॅण्डसह कर्मचारी रात्रंदिवस काम करून मसोबाच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचवल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
सरपंच विलास सोनवणे यांनी बाळासाहेब थोरात यांनी अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले असून, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी कायम उभे राहायला हवे असे आवाहन केले. अविनाश सोनवणे यांनी काही लोक सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दिशाभूल करत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना वेळीच रोखण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सरपंच विलास अण्णा सोनवणे, बाबा ओहोळ, प्रभाकर कांदळकर, नामदेव दादा दिघे, अनिल कांदळकर, राजू गोडगे, विजय गोडगे, सतीश सोनवणे, डॉ. सुहास आभाळे, विनोद गोडगे, सचिन दिघे, योगेश सोनवणे, संदेश गोडगे, अशोक गोडगे, के. डी. सोनवणे, अरुण आभाळे, सोमनाथ आभाळे, भास्कर पानसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हौशीराम सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन विलास मास्तर सोनवणे यांनी केले.


