संगमनेर, प्रतिनिधी
पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात साकूर पठार भागातील गावांचा समावेश नसल्याने ती अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहेत.
पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात पठार भागाच्या समावेशाला अकोले तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. त्यामुळे या भागातील नागरिक मोरवाडी येथे स्वतंत्र धरण व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. यामुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या भागाचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. हा सर्व्हे पूर्ण झाला असून, आता येत्या बुधवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांना धमकावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील… विधानसभा निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत खताळ म्हणाले, माजी आमदारांच्या बगलबच्चांचा आपण बंदोबस्त केला आहे. जे काही थोडेफार राहिले आहेत, त्यांचा सुद्धा बंदोबस्त केला जाईल. परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्त्यांनी अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करावे, मात्र जर जास्त त्रास दिला तर नक्कीच बंदोबस्त केला जाईल.
दत्त महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपयांची घोषणा… आमदार खताळ यांनी वरवंडी येथील दत्त महाराजांच्या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन केले. तसेच हे मंदिर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आमदार निधीतून दत्त महाराजांच्या मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये देण्याची घोषणाही केली. सभामंडप कुठे घ्यायचा, हे ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठरवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.


