
संगमनेर, प्रतिनिधी
प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं.
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनिता कानवडे, वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान, शालिनीताई विखे, मंगल खताळ, नीलम खताळ आणि इतर उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांसोबत सात फेरे घेतले.

शालिनीताई विखे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांना योग्य संस्कार मिळत होते. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संस्कार मिळणे कठीण झाले आहे. महिलांनी एकमेकींचे पाय ओढण्याऐवजी एकमेकींना सहकार्य करावे. विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान-सन्मान द्यावा. पती निवर्तल्यानंतरही महिला कुंकू लावू शकते, कारण ती देखील समाजाचा एक भाग आहे. मुलगाच वंशाचा दिवा नाही, तर मुलगी देखील पणती आहे आणि ती कायम प्रकाश देते.
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त भेट देण्यात येणाऱ्या वडाच्या रोपांचे रोपण करण्याचे आवाहन केले. यामुळे ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळेल, त्यामुळे सर्व महिलांनी या वटवृक्षाचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले.
नीलम खताळ यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, महिलांच्या दृष्टीने वटपौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे. जसा हा वड वाढत गेला, तसेच या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित येऊन परिवर्तन केले आहे. त्यामुळे मी आणि तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात, भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिक पत्नींचा आणि बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचवणाऱ्या कविता खताळ यांचा वटवृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, महिला पोलीस अनिता गुंजाळ, मीरा बिबवे, सविता सोळशे, शशीकला हांडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, निशा धाडी, माधुरी मुंडलिक या महिला कर्मचाऱ्यांचा उपस्थित महिलांच्या हस्ते रोप देऊन गौरव करण्यात आला.


