अहिल्यानगर-
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला राज्य सरकारकडून २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

ग्रामविकास विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या या निधीतून वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान यांसारख्या आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृतीनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे जातात. या प्रवासात वारकऱ्यांची, विशेषतः महिला वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालखी नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी, प्रमुख देवस्थानांचे प्रतिनिधी आणि दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. पालखी मार्गावरील अडचणी समजून घेत प्रशासनाने सर्व सुविधा वेळेत पुरवण्याचे आश्वासन दिले. यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याने सुरू केलेला हा पॅटर्न आता राज्यभर आदर्श मानला जात असून, सोलापूर जिल्ह्यातही याच धर्तीवर नियोजन सुरू झाले आहे.
बैठकीत वारकऱ्यांनी पावसाळ्यातील मुक्कामादरम्यान वॉटरप्रूफ मंडपांची गरज, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या अधोरेखित केली. यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री विखे पाटील यांनी संबंधित प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सर्व पालखी मार्गांवर या सुविधा तातडीने पुरवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होण्यास मदत होईल.


