राज्याच्या राजकारणात नवा पैलू निर्माण करू पाहणार्या दोन ठाकरेंच्या एक होण्याच्या संभाव्य घटनेने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. असं काही झालं तर त्याचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळतील आणि अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेल्या महायुतीला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चिन्हं दिसू लागली होती. दोन भाऊ एक होण्याची शक्यता दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही हायसं झालं होतं. सत्तेचा वारू उधळणार्या भाजपला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने आपला फायदा न होता भाजपची उडू पाहणारी संभाव्य त्रेधा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हवीच होती. यामुळे आतून काहीही वाटत असलं तरी दोन्ही भाऊ एक व्हावेत, अशा मानसिकतेत आघाडीचे नेते होते. दोन भावांच्या एकत्रित होण्याचे परिणाम भाजप वगळता सर्वांनाच शुभ संकेतासारखे वाटत होते. असं होणं हे आपल्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखं असल्याने कुठल्याही परिस्थितीत ही युती होणार नाही, असे प्रयत्न भाजपने सुरू केले. यामुळेच संभाव्य एकत्रिकरणावर सर्वाधिक टीका ही भाजपच्या नेत्यांकडून होऊ लागली होती. ज्यांचा काही संबंध नाही ते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे उगाच बगबग करत होते. मुंबईचं पालक मंत्रीपद असलेल्या अशिष शेलार यांना दोन भावांमधलं प्रेमाने हैराण करून सोडलं होतं. संकटात तेरावा महिना म्हणतात तसं भाजपच्या नेत्यांचं झालं होतं. निवडणूक असो की आणखी काही, शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांना तोंड देणं भाजपला शक्य नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीत दोन भावांच्या युतीत खडा टाकण्याचे प्रयत्न युतीची चर्चा सुरू झाल्यापासून सुरू होते. याची परिणती फडणवीस भेटीने घडवून आणली आणि होत्या नव्हत्या त्या एकत्रिकरणाच्या चर्चांवर पाणी पडलं. सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. भाजपच्या तोडा-फोडा या नीतीला पुन्हा एकदा राज ठाकरे बळी पडले.
रविवार विशेष लेख… राज भेटीमागचं कपट कारस्थान…!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.




अशा परिस्थितीत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येणार्या महानगरपालिकांच्या विशेषत: मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात असं भाजपला वाटणं स्वाभाविक. याला खोडा आहे तो ठाकरे भाऊ एकत्र होण्याच्या चर्चेचा. उध्दव आणि राज या निवडणुकीत एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाचंही चित्र बदलू शकतं, हे भाजपला ठावूक आहे. याकरता राज यांच्या मनसे पदाधिकार्यांकडून माध्यमांकरवी खुस्पटं काढण्याचे पुरेपूर प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी करून पाहिले. कागाळ्या करण्याच्या या कृतीची जाणीव झाल्याने या दोन्ही भावांनी कोणीही बोलायचं नाही, असा अलिखित फतवा काढला. एकत्रिकरणातील ही महत्वाची आणि पोषक घटना होती. दोन्ही पक्षांच्या तळागळातील कार्यकर्त्यांना या निर्णयाने हायसं झालं होतं. भाजप आणि भाजप प्रणित महायुतीसाठी ही धोक्याची घंटा होती. याच धोक्याला डोळ्यासमोर धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज यांच्या भेटीचा घाट घातला. एका पंचतारांकित हॉटेलात झालेल्या एक तासाच्या भेटीने ठाकरेंच्या एकीच्या सकारात्मक वातावरणावर बोळा फिरवला. जो फडणवीस आणि भाजपला हवाच होता. भेटीचा विषय काहीही असला तरी एका भेटीने आपल्याला हव्या असलेल्या परिणामांचा आनंद स्वत: फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांच्या चेहर्यावर दिसू लागला आहे. भाजपच्या तोडा-फोडा-जोडा या नीतीला राज ठाकरे पुन्हा बधले. यामुळे राज हे राज्यभर टीकेचा विषय बनले आहेत.
फडणवीसांच्या एका भेटीने वर्तमानपत्रांच्या मथळ्यांनी राज यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण केला. प्रत्यक्ष कृतीत जे हाती आहे ते ही हातचं जाण्याची भीती आहे. हे राज यांना कोणी सांगावं असं नाही. याआधी राज यांच्यावर इतरांप्रमाणे बजावलेल्या ईडीच्या नोटीसांचे परिणाम महाराष्ट्राने पाहिलेच आहेत. याचा अपेक्षित फायदा भाजपलाच झाला. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये राज यांनी नरेंद्र मोदींची भलामण केली आणि आपण कसंही वाकू शकतो, हे दाखवून दिलं. मुंबई महानगरपालिका हे तर स्वतंत्र राज्यच आहे. या महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-नीतीचा वापर करण्यावाचून पर्याय नाही, याची जाणीव झालेल्या फडणवीसांनी डाव टाकला आणि राज यांची भेट घेऊन दोन भावांच्या भेटीतील विश्वास डळमळीत करून टाकला. या भेटीवर दोन्ही पक्षांकडून काहीएक प्रतिक्रिया आली नसली तरी राज यांच्यावरील विश्वासालाही तडे पाडण्यात फडणवीस यशस्वी ठरलेत हे मात्र नक्की. आपल्या अस्तित्वाची जाणीव असलेल्या राज यांनी ऐनवेळी अशी कच खाणं हे आजचं नाही. पण आता असं करणं म्हणजे मुंबई भाजपसाठी आंदण देण्याचा मार्ग सुकर करणं होय. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोणाला नकोय? राज्यात सत्ता असताना मुंबई पारखी राहणं म्हणजे केंद्रात सत्ता असून दिल्ली पारखी राहण्यासारखं होतं. देशाचं राजकारण करणार्या मुंबईवरील मराठीचा अधिकार महानगरपालिकेच्या सत्तेत होता. तो राज हातचा घालवणार असतील, तर काळ त्यांना माफ नाही करणार.
