संगमनेर, प्रतिनिधी:
शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यान म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.

यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती आणि आता पुन्हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पण झाले, हा एक सकारात्मक योगायोग आहे
म्हाळुंगी नदीचा पूल पडल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून या पुलामुळे मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, अविनाश थोरात, कैलास लोणारी, कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर, अल्पना तांबे, उषा कपिले, कांचन ढोरे, कावेरी नवले, दिपाली वाव्हळ, रेखा गलांडे, पुनम अनाप, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, लखन घोरपडे, सौरभ देशमुख, शौकत जहागीरदार, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, संपत गलांडे, राहुल भोईर, शशांक नामन, सुशील शेवाळे, मुजफ्फर जहागीरदार, सुयोग गुंजाळ, तुषार ठाकूर, तसेच या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत मामा, अजित गुंजाळ, गौतम शाह, शैलेश मंडलिक, जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘आम्ही कायम जनतेसोबत’ –
“संगमनेर शहरातील साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा भागातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागात विकासाची कामे आणखी गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.” – अमोल खताळ, आमदार.



