संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी, तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांनी मंगळवारी (दि. १७) संगमनेर शहरात निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. शेतात शौचाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील बस स्थानकासमोर हा रास्ता रोको करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चाने बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोदरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली.
आंदोलकांनी कर्जुले पठार येथील हत्येप्रकरणी वाढीव कलमे लावण्याची, पैशाअभावी उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची, आरोपींना फाशी देण्याची आणि अत्याचारित कुटुंबाला धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच, कोकणगाव येथील युवकांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी बोलताना गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांच्यावर देखील अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कर्जुले पठार गावातील अन्यायग्रस्त कुटुंबाला त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करून, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तालुक्यात मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, असेही आवाहन करण्यात आले.

यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आजी-माजी आमदार या घटनेबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पालकमंत्रीही या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.
कर्जुले पठार येथील घटनेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा यापुढे कुठल्याही आदिवासी अथवा मागासवर्गीय समाजावर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम, विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बर्डे, दलित पॅंथरचे राजू खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मनसे तालुकाध्यक्ष योगेश सुर्यवंशी, प्रदीप थोरात, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, अनिल बर्डे, विजय खरात, मंजाबापू साळवे, आकाश गोडगे, आनंद केदार, देवीदास माळी, लक्ष्मण साठे, माणिक यादव, कुंदन माळी, किरण रोहम, विकास जाधव, शशिकांत दारोळे, योगेश मुन्तोंडे, मधुकर सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अजिज ओहरा, वैभव मोकळ, मधुकर सोनवणे, राम दारोळे, भाऊसाहेब माळी, सिद्धार्थ खरात, बाळासाहेब पवार, पोपट मेंगाळ, संपत भोसले, सागर शिंदे, विशाल वैराळ, बाळू कदम, नानासाहेब कदम, राम शिरडकर, रूपेश राऊत, बाळासाहेब दरेकर, अनिल जाधव, शहनवाज बेगमपुरे, गणीभाई मोमिन, रूपाली सोनवणे, पूनम माळी, मंदा पवार आदींसह मोठ्या संख्येने दलित आणि आदिवासी कार्यकर्ते, महिला आणि युवक उपस्थित होते.
पोलीस उपाधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे दीड तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


