रेशीम शेतीतून जिल्ह्यातील १०२ शेतकऱ्यांना गवसला आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग, शेतकऱ्यांना ८५ लाखांचे अनुदान वितरित
सन २०२४-२५ च्या दरानुसार कुशल व अकुशल मिळून तीन वर्षात ४ लाख ३२ हजार २४० रुपयांचा लाभही देण्यात येतो.

तुती रेशीम उद्योगाचे फायदे – रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते. एकदा तुती लागवड केली की १२ ते १५ वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. तसेच एकदा किटक संगोपन गृह बांधले व साहित्य खरेदी केली की पुन्हा खर्च येत नाही. तुती रोपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यात तुती बाग किटक संगोपनासाठी योग्य होते. कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्ह्याळ्यात अथवा दुष्काळात दोन महिने पाणी नसतानाही तद्नंतर मिळालेल्या पाण्यावर बागा पून्हा उगवून येते. कीड व रोग नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपीट पासुन बागेस विशेष नुकसान होत नाही. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते. संगोपनातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला हे कुजवून चांगले खत तयार होते व हा काडीकचरा गांडूळास दिल्यास अतिशय चांगल्या प्रकारे गांडूळ खत या पासून मिळते.
रेशीम उद्योग भांडवलासाठी बँकेकडून अर्थसहाय्य – रेशीम शेती उद्योग सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी मोठी अडचण येते. यासाठी नाबार्डने सन २०२४ – २०२५ साठी सुधारित निकषास मान्यता दिलेली आहे. रेशीम उद्योगासाठी प्रकल्प मूल्य ६ लाख ५२ हजार ५१५ इतके निश्चित केले असून त्यापैकी ९० टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्हा सहकारी बँकेमार्फत तुती लागवड व्यवस्थापन व संगोपन खर्चासाठी कमाल १ लाख ८५ हजार रुपये पीककर्ज उपलब्ध होणार आहे.

