संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सह्याद्री विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले, योगामुळे शरीर लवचिक होते, त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करावीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही आरोग्याला जपण्याचा मंत्र दिला होता. दररोज किमान वीस मिनिटे योगाभ्यास करणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कारासारख्या आसनांमुळे शरीराला उत्तम ऊर्जा मिळते.
डॉ. जयश्री थोरात यांनी योग ही भारताची जगाला दिलेली देणगी असल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या, केवळ योग दिनापुरता योग न करता, स्वतःसाठी दररोज थोडा वेळ काढून योगाभ्यास करा. कारण चांगले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. मन आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
या शिबिरात सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे 3500 विद्यार्थी आणि एकविरा व जयहिंद लोक चळवळीचे 500 युवक सहभागी झाले होते. त्यांनी एकत्रितपणे योगाचे विविध प्रकार सादर करत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला.

यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, सह्याद्री संस्थेचे रजिस्टार उमेश डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी नंदा वलवे, सह सेक्रेटरी आचार्य बाबुराव गवांदे, ॲड. सुहास आहेर, प्राचार्य के. जी. खेमनर, योगशिक्षक किशोर देशमुख, जालिंदर नाईक, भारत शिंदे, उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे, पर्यवेक्षक ज्ञानदेव पवार, संगीता रणशूर आदींसह सर्व शिक्षक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगशिक्षक किशोर देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य बाबुराव गवांदे यांनी केले, सूत्रसंचालन डी. व्ही. गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य के. जी. खेमनर यांनी आभार मानले. याप्रसंगी एकविरा फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना पौष्टिक डिंक लाडूंचे वाटप करण्यात आले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना सांगितले की, योगामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मन शांत होते आणि संपूर्ण आरोग्य सदृढ राहते. नियमित योगाभ्यासामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि मानसिक ताण दूर होतो. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करावा.


