संगमनेर, प्रतिनिधी:
दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटींच्या अपहाराचा फटका बसलेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे पैसे परत मिळावेत यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीने स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला असून, यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह (ACB) प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

भाऊसाहेब कुटे याच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी… संघर्ष समितीच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पाठवलेल्या निवेदनात, ३२ वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मालमत्तेची कसून चौकशी करून ती जप्त करावी आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे, अशी मागणी समितीने केली आहे.
ठेवीदारांची दयनीय अवस्था आणि १० आत्महत्या… दूधगंगा पतसंस्थेत ८१ कोटींचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले असून, यात चेअरमनसह मॅनेजर आणि इतर २१ आरोपींचा समावेश आहे. गेल्या दीड वर्षांपासून २ हजारांहून अधिक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये संस्थेत अडकले आहेत. या ठेवीदारांमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, टपरीधारक आणि छोटे व्यावसायिक यांचा समावेश आहे. ठेवी परत मिळत नसल्याने त्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य, आजारपण आणि दैनंदिन गरजा भागवणे अशक्य झाले आहे. या आर्थिक अडचणींना कंटाळून आतापर्यंत १० ठेवीदारांनी आत्महत्या केल्या असून, काहीजण आत्महत्येच्या मानसिकतेत असल्याचे समितीने म्हटले आहे. वारंवार पतसंस्थेकडे चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सामूहिक आत्मदहनाचा इशारा… ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी दूधगंगा पतसंस्था कार्यालयासमोर सर्व ठेवीदार सामूहिक आत्मदहन करतील, असा गंभीर इशारा संघर्ष समितीचे प्रतिनिधी मोहन लांडगे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.


