महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे:
रस्त्यावरून चाललेल्या एका तरुणाचे अपहरण करून, केवळ दोन हजार रुपयांसाठी त्याचा निर्घृण खून करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ४० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली.

पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे आणि अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जन्मठेपेसोबतच प्रत्येकाला सहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ही दुर्दैवी घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली होती. मृत तरुणाचे नाव रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९) असे आहे, तो मूळचा मध्य प्रदेशचा होता आणि पुण्यात बांधकामांच्या ठिकाणी फरशी बसवण्याचे काम करत होता.
घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे जात असताना रामअवतार रस्त्यात आडवा आला. यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडले. यावरून आरोपींनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, त्याने नकार दिल्याने त्यांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि वनशिव वस्ती येथील एका मोकळ्या जागेत नेले.

तिथे त्यांनी रामअवतारच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आणि त्याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. नातेवाइकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांनी संगनमत करून रामअवतारचा दोरीने गळा आवळला आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. त्यांनी कोर्टासमोर व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारखे ठोस पुरावे सादर केले. या पुराव्यांच्या आधारावरच न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार गणेश तेळकर यांनी सरकार पक्षाला मोलाचे सहकार्य केले.


