संगमनेर, अहिल्यानगर:
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरच्या जमजम कॉलनीत एका पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून 2700 किलो गोमांसासह एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कारवाईत देखील आरोपी नेहमीप्रमाणे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस अवैध कत्तलखान्यांवर नियंत्रण असल्याचा कितीही दावा करत असले तरी, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे त्यांचे पितळ उघडे पडले. संगमनेरातील गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असल्याचे आणि स्थानिक पोलिसांचा याकडे असलेला अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा यामुळे समोर आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाला संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत जमजम कॉलनीत हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोदामात काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता, तिथे 8 ते 9 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच हे संशयित आडोशाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 2700 किलो गोमांस, 2 महिंद्रा बोलेरो पिकअप, 1 अशोक लेलंड कंपनीचा ‘बडा दोस्त’, 5 दुचाकी वाहने, 4 इलेक्ट्रिक वजनकाटे, लोखंडी सुरा, लोखंडी कुऱ्हाड आणि 2 मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
या प्रकरणी, पथकाच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेले मुख्य संशयित आणि गोवंश कत्तलीच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती मिळवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये हाजी मुदस्सर कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), नवाज जावेद कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), फईम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), अक्रम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), समीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) आणि इतर 4 ते 5 अज्ञात इसमांचा समावेश आहे. या सर्व आरोपीविरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 600/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 च्या सुधारित 2015 च्या कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.
-
वारंवार कारवाईतून तेच-तेच आरोपी निष्पन्न, कारवाई शून्य… संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पोलिसांनी आतापर्यंत शेकड्याने कारवाया केल्या आहे. या कारवाईमध्ये प्रत्यक्षात सापडणाऱ्या आरोपींची संख्या बोटावर मोजण्या एवढी असते. तर अनेकदा कारवाईदरम्यान आरोपी पळून गेल्याचे सांगितले जाते. मात्र दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी बघता या कत्तलीच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न झाले आहे मात्र या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक पोलिसांसह एलसीबी आणि पोलीस अधीक्षकांचे पथक देखील अपयशी ठरले आहे.







या प्रकरणी, पथकाच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेले मुख्य संशयित