संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यात गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील चारही दिशांना वाळू, मुरूम, खडी, डबर आणि मातीसारख्या गौण खनिजांची सर्रासपणे तस्करी सुरू आहे. निमज गावाच्या शिवारात खासगी रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैध उपसा करून वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती स्थानिक तलाठी यांना मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला. मात्र, कारवाई सुरू होताच जेसीबीसह इतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारवाई करताना सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी पुढाऱ्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर दबाव येत असल्याचेही बोलले जात आहे.
सोमवारी निमज शिवारात मुरूम टाकून रस्ता तयार केला जात असल्याचे काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होता. ग्रामस्थांनी याबाबत तलाठी फटांगरे यांना माहिती दिली. तलाठी फटांगरे घटनास्थळी पोहोचेपर्यंत जेसीबी आणि इतर ट्रॅक्टर पळून गेले होते. मात्र, रस्ता तयार करताना जमिनीत अडकलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह जागेवरच पकडण्यात आला. या ट्रॅक्टरला बाहेर काढताना आणखी एक ट्रॅक्टरही मिळून आला. तलाठी फटांगरे यांनी या ठिकाणी पंचनामा करून सर्व माहिती तहसील कार्यालयात कळवल्याचे सांगितले.
परवाना असल्याचा कांगावा, तरीही कारवाईचा पवित्रा- मुरूम उपसा करणाऱ्यांनी सत्ताधारी नेत्यांची नावे घेऊन तलाठी मंडलिक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. ‘आमच्याकडे परवाना आहे,’ असा कांगावाही त्यांनी केला, मात्र कोणीही परवाना दाखवला नाही. सदर पंचनामा तहसील कार्यालयात सादर करण्यात आला असून, कागदपत्रांची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तलाठी फटांगरे यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी- इतक्या मोठ्या प्रमाणात मुरूम तस्करीचा पंचनामा होऊनही, राजकीय दबावामुळे पकडलेला ट्रॅक्टर आणि जेसीबी अद्यापही तहसील कार्यालयात जमा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनावर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात पुढील कारवाई कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निमजमध्ये खासगी रस्त्यासाठी अवैध मुरूम वाहतूक; तलाठ्याने पकडला ट्रॅक्टर नंतर घडले असं काही…
महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.



महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत.
परवाना असल्याचा कांगावा, तरीही कारवाईचा पवित्रा-
