
जामखेड:
जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात बाजार समितीच्या १२ सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. वराट हे बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याची तक्रार या सदस्यांनी केली असून, त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार, जिल्हाधिकाऱ्यांना असे पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत समितीची विशेष सभा बोलावून या विषयावर समिती सदस्यांच्या मतदानाद्वारे निर्णय घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या या निवेदनावर बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांच्यासह संचालक सचिन घुमरे, नंदकुमार गोरे, अंकुश ढवळे, विष्णू भोंडवे, गौतम उतेकर, गणेश जगताप, वैजिनाथ पाटील, बेदमुथ्था राहुल सुरेश, हलगुंडे रवींद्र शिवराम, ससाणे सीताराम चिमाणी आणि नारायण तुकाराम जायभाय या १२ सदस्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात उपसभापतींच्या मनमानी कारभारावर, तसेच संचालकांनी सुचवलेल्या शेतकरी हिताच्या आणि बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या सूचनांकडे त्यांनी केलेल्या दुर्लक्षावर प्रामुख्याने लक्ष वेधण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिली.


