संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनली असून, मंगळवारी, (१ जुलै) बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी केवळ संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर राहुरी, अकोले, राहाता आणि सिन्नर तालुक्यांमधूनही अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता. रोहित जाधव (संगमनेर) आणि प्रवीण पवार (राहुरी) यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते.
ड्रॅगनफ्रूटला प्रतिकिलो किमान ५० रुपये ते कमाल ८० रुपये असा भाव मिळाला. तर डाळिंबाची २६८८ क्रेट्सची विक्रमी आवक झाली. डाळिंबाला प्रतिकिलो किमान १०० रुपये ते कमाल २५१ रुपये असा उत्कृष्ट भाव मिळाला.

बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ म्हणाले, बाजार समितीमध्ये सध्या ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब, कांदा आणि टोमॅटो यांसारख्या शेतमालांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
या यशामागे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. थोरात साहेबांचे बाजार समितीच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष असून, त्यांनी कायम शेतकरी हित जपले आहे, असे सांगत शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब आणि इतर शेतमाल योग्य प्रतवारी करूनच बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, जेणेकरून त्यांना त्यांच्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळेल.


