महाराष्ट्र संवाद न्यूज- मुंबई
जवळपास दोन दशकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे महायुती सरकारने रद्द केल्यानंतरच्या विजयी मेळाव्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी शनिवारी (५ जुलै) वरळी डोम येथे हा भव्य मेळावा आयोजित केला होता. या ऐतिहासिक क्षणी दोन्ही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकजूट दर्शवली.
राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला: “बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं!”
या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनंतर माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर मैदानावर व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं,” असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सर्वात लक्षवेधी विधान करताना, राज ठाकरे म्हणाले, “मला आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.” या विधानाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पिकला.
राज ठाकरे यांनी आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा संदर्भ देत, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे देखील इंग्रजी शाळेत शिकले होते, परंतु त्यांचा मराठी अभिमान कणभरही कमी झाला नाही, असे स्पष्ट केले. मराठी भाषेसाठी यापुढेही ही एकजूट कायम राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरेंकडून भाजपावर हल्लाबोल: “निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो!”
राज ठाकरेंनंतर व्यासपीठावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत.” अनेक वर्षांनी राजसोबत व्यासपीठावर भेट झाल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा ‘सन्माननीय राज ठाकरे’ असा उल्लेख केला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्यातील दुरी कमी होण्यामागे ‘अनाजी पंत’ जबाबदार असल्याचे सांगत, अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. “आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी,” असे म्हणत त्यांनी भविष्यातही एकजुटीने काम करण्याचे संकेत दिले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर पलटवार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत, कोण लिंबू कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता, तर कुठे असता तुम्ही. मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत.”
मेळाव्याला सुरुवात होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये एकत्रित थाटात एन्ट्री घेतली. ठाकरे घराण्याचे गाणे वाजत असताना, दोन्ही भावांनी एकाचवेळी मंचावर प्रवेश केला. या क्षणी त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. हा क्षण ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक आणि एकतेचे प्रतीक होता.
या विजयी मेळाव्याने केवळ हिंदी सक्ती रद्द झाल्याचा आनंद साजरा केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या संभाव्य पुनर्मिलनाची आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची नांदी देखील दिली.
ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र, हिंदी सक्ती रद्द झाल्याच्या जल्लोषात सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका… बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं! राज ठाकरे; आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी! उद्धव ठाकरे
या विजयी मेळाव्याने केवळ हिंदी सक्ती रद्द झाल्याचा आनंद साजरा केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या संभाव्य पुनर्मिलनाची आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची नांदी देखील दिली.



राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला: “बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं!”
उद्धव ठाकरेंकडून भाजपावर हल्लाबोल: “निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो!”
मेळाव्याला सुरुवात होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये एकत्रित थाटात एन्ट्री घेतली.