महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई:
मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच ठाणे-पालघरचे मनसे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. 
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने या मोर्चाचे आयोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असून, अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होती. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे मीरा भाईंदर आणि मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. हा मोर्चा आज सकाळी १० वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मीरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार होती.


