संगमनेर, प्रतिनिधी:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत कनोली येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपयांची मागणी या तलाठ्याने केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये घेताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अहिल्यानगर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांचे मित्र शासनाच्या धोरणानुसार मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू वाहतुकीचं काम करत होते. संगमनेरचे तहसीलदार यांनी या कामासाठी त्यांना मंजुरी दिली होती. मात्र, तलाठी संतोष शेलार यांनी या कामासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास अवैध वाळू वाहतुकीचा ठपका ठेवून कारवाई करण्याची धमकी तलाठ्याने दिली होती.
तक्रार मिळाल्यानंतर, मंगळवारी (७ जुलै) ACB ने पडताळणी केली. यात तलाठी शेलार यांनी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्याच दिवशी सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच घेताना तलाठी शेलार यांना रंगेहात पकडण्यात आले.
तलाठी शेलार यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.




