

संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
२४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. तर तौफिक आयुब इनामदार याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, या मारहाणीत तक्रारदाराचे पुढील खालचे दोन दात पडले आणि शेजारील दोन दात हलू लागले. या घटनेनंतर २५ जून, २०१५ रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
याप्रकरणी अमोल अशोक भवर, तौफिक आयुब इनामदार आणि आयुब कादर इनामदार या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रफिक अहमद अब्दुल कादर पठाण यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीं विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्यासमोर झाली. अभियोग पक्षाने या खटल्यात तक्रारदार राजाराम लक्ष्मण कढणे, पंच तुषार गोरक्षनाथ कुळधरण व कैलासनाथ रामेश्वर सोमाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव संभाजी घोडके, साक्षीदार प्रवीण तानाजी वर्पे आणि तपासी अंमलदार रफिक अहमद अब्दुल कादर पठाण यांच्या साक्षी नोंदवल्या.
न्यायाधीश भेंडे यांनी यावेळी सरकारी वकील प्रणव भामरे आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या संदर्भात निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आरोपी तौफिक आयुब इनामदार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अन्वये (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे) दोषी ठरवण्यात आले असून त्याला न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे.
यातील अन्य दोन आरोपी अनुक्रमे अमोल अशोक भवर आणि आयुब कादर इनामदार यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये लावण्यात आलेल्या आरोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(१) अन्वये निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर तक्रारदार राजाराम लक्ष्मण कढणे यांना दंडाच्या रकमेतून पाचशे रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



याप्रकरणी अमोल अशोक भवर, तौफिक आयुब इनामदार आणि आयुब कादर इनामदार या
यातील अन्य दोन आरोपी अनुक्रमे अमोल अशोक भवर आणि आयुब कादर इनामदार यांना