

संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका कर्मचाऱ्याला गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कर्मचाऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला गेला. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर दुर्घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामातील सुरक्षा उपाययोजनांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिगत गटार कामादरम्यान आवश्यक सुरक्षा मानके पाळली गेली होती का, याबाबत सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होतो याकडे लक्ष लागले आहे.





