महाराष्ट्र संवाद न्यूज:
महायुती सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कोणत्याही कामाच्या मोबदल्यात हल्ली लाखो रुपयांची लाच सर्वसामान्यांकडून मागत असल्याने या अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. सिमेंट रस्त्याच्या बिलापोटी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगर उत्थान योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी 3 टक्के दराने 6 लाख रुपयांची मागणी केली होती. याव्यतिरिक्त, उर्वरित रस्त्यांच्या कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजेच रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यासाठी, त्यांनी आणखी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. अशा प्रकारे, चव्हाण यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

कंत्राटदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर, एसीबीने सापळा रचला. चंद्रकांत चव्हाण हे 6 लाख रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच, चव्हाण यांच्या घराची तपासणी देखील करण्यात आली आहे. एसीबीचे अधिकारी पुढील तपास करत आहे.
या घटनेमुळे प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून केवळ निलंबनाची कारवाई न करता कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.


