

मुंबई, ११ जुलै २०२५:
आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर येथे भुयारी गटार साफ करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मांडली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी देखील अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या आणि या घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली.
आमदार तांबे यांनी संगमनेर मधील दुर्दैवी घटने संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली होती, परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण होते. काल, नगरपालिकेने अनधिकृतपणे जोडलेल्या गटाराची साफसफाई करत असताना, ठेकेदाराचा कर्मचारी अतुल पवार गटारात उतरला आणि विषारी वायूमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पठाण नावाचा दुसरा तरुणही या घटनेत बळी पडला. ही घटना अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
या दुर्घटनेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढत आमदार तांबे म्हणाले, गटार साफसफाईसाठी माणसांना गटारात उतरवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि या सभागृहात यावर यापूर्वीही अनेकवेळा चर्चा झाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी आहे.
त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर, ज्या नगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे अपूर्ण काम असतानाही गटार अनधिकृतपणे जोडले, त्यांच्यावरही कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाचे म्हणजे, तांबे यांनी यावेळी मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, या निष्पाप कामगारांच्या मृत्यूची भरपाई कोणीही करू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांना जगण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे, प्रत्येक मृतकाच्या कुटुंबियांना संगमनेर नगरपालिकेकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. जर नगरपालिका ही भरपाई देऊ शकली नाही, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून सरकारने ती तातडीने उपलब्ध करून द्यावी.
आमदार तांबे यांनी सरकारला या घटनेची गंभीर दखल घेऊन मृतकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही सभागृहात देण्याची विनंती केली.



महत्त्वाचे म्हणजे, तांबे यांनी यावेळी
