

संगमनेर, प्रतिनिधी:
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीमार्गे अगदी शेवटपर्यंत पोहोचले असले तरी, धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी ८ जुलै २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून वाहून जाणारे पाणी उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे सोडण्याची मागणी केली होती. यामुळे बंधारे आणि नाला बंडिंग भरून घेता येतील, तसेच परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल, असे थोरात यांनी पत्रात नमूद केले होते.
शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोरात यांच्या मागणीची दखल घेत, जलसंपदा विभाग आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५ जुलै रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आज निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, भविष्यात हे पाणी आणखी वाढवण्यात येणार आहे.
सध्या संगमनेर तालुक्यासह धरणाच्या लाभक्षेत्रात अत्यंत कमी पाऊस असल्याने, निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आलेल्या या पाण्यामुळे अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, राहुरी, आणि सिन्नर या तालुक्यांमधील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे
