संगमनेर, प्रतिनिधी:
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वपक्षीय नागरिकांनी शुक्रवारी एकत्र येऊन तीव्र निषेध केला. हा हल्ला करणारा ‘काटे’ केवळ एक मुखवटा असून, त्यामागील खरे सूत्रधार शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध सभेत छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन विकास मंच, गाथा परिवार यांसारख्या पुरोगामी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आदी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रा. हिरालाल पगडाल, शिवसेनेचे अमर कतारी, अनिकेत घुले, ॲड. समीर लामखडे, राम अरगडे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, किरण रोहम, राजा आवसक, जावेद शेख, सुरेश झावरे आदी उपस्थित होते.
निषेध सभेपूर्वी संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला, यात छात्र भारती आणि राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला अत्यंत भ्याड आणि निंदनीय आहे. त्यांचा विचार सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे. ‘मराठा’ हा शब्द महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा विचार ते मांडत होते. मात्र जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
थोरात यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीका करताना म्हटले, भाजप आणि आरएसएसचा शिवधर्म खरा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाली, तेव्हा त्यांचे लोक एक शब्दही बोलले नाहीत. महाराजांबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले, तेव्हा सत्ताधारी बोलले नाहीत. त्यांनी जातीय राजकारणासाठी वेगवेगळी व्यासपीठे निर्माण केली आहेत आणि त्यातून ते जातीय विष पेरत आहेत. राज्यात गुंडांना हाताशी धरून दहशत निर्माण केली जात आहे.
पुरोगामी विचार सांगणारे दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लागत नाही. बीडमधील संतोष देशमुख प्रकरण, परभणीतील सोनवणे यांचा मृत्यू हे सर्व घडत असताना विधानसभेच्या परिसरात मारामारी होते, हे अत्यंत निंदनीय आहे. चाळीस वर्षांत असे कधी चित्र नव्हते. कॅन्टीनमध्ये आमदार मारहाण करतो आणि आमदारांवर कोणतीही कारवाई न होता, कॅन्टीनवाल्यावर कारवाई होते, हा काय प्रकार आहे?

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत, त्याचा काय उपयोग होणार आहे? गुन्हेगार कोणीही असो, कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर उद्या हे लोक जामिनावर सुटतील आणि पुन्हा भाजपचे पुढारी म्हणून मिरवतील. हा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून, महाराष्ट्रात वाढलेली दहशत, ढासळलेली कायदा-व्यवस्था आणि जे सरकार गोरगरिबांचे रक्षण करू शकत नाही, अशा या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका थोरात यांनी महायुती सरकारवर केली.
थोरात यांनी यावेळी देशातील माध्यमांच्या स्वातंत्र्यावरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही सुरू आहे. तेथे एकच न्यूज चॅनल आणि एकच वृत्तपत्र आहे. सरकार सांगेल तेच ऐकले जात आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य काढून घेतले आहे. तीच परिस्थिती भारतामध्येही सुरू आहे. माध्यमांवर अनेक निर्बंध आहेत, त्यांना व्यक्त होता येत नाही. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. माध्यमांनी जर वेळीच योग्य भूमिका घेतली नाही, तर भारतामध्येही उत्तर कोरियासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीतीही थोरात यांनी व्यक्त केली.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, धर्माच्या नावावर भाजप सध्या राजकारण करत असून, गुंड लोकांना हाताशी धरून पुरोगामी विचार आणि लोकशाही संपवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. युवकांनी एकत्र येऊन अशा देशविघातक शक्तींना थांबवण्यासाठी विचारांची जोरदार लढाई करणे गरजेचे आहे.
डॉ. जयश्री थोरात यांनी चिंता व्यक्त केली की, भाजपने जनसुरक्षा कायदा हा भाजप रक्षा कायदा केला आहे, यामुळे सर्वसामान्य जनतेला आंदोलनाचा अधिकार आता राहणार नाही. संतांचा व समतेचा पुरोगामी विचार सांगणाऱ्या प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला असून, महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.
अनिकेत घुले म्हणाले की, हल्ले करणारे हे भिडे गुरुजी समर्थक आहेत, तर आपण साने गुरुजी समर्थक आहोत.
यावेळी शिवसेनेचे अमर कतारी, प्रा. हिरालाल पगडाल, प्रा. उल्हास पाटील, अजय फटांगरे, दत्ता ढगे, किरण रोहम यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

