महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून या तालुक्याला प्रगतीपथावर नेले आहे. युवक काँग्रेसने आयोजित केलेला हा ‘युवा संगम’ कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते व माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले.
संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी आमदार उल्हासदादा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते हनुमंत पवार, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, राज्य उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन, ऋषिकेश पाटील, बालाजी गाडे, संग्राम खोपडे यांच्यासह आयोजक डॉ. जयश्रीताई थोरात, गिरीजा पिचड, राहुल उगले आदींसह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडक टीका केली. ते म्हणाले की, सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून खोटा इतिहास पसरवला जात असून प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले जात आहेत. तरुण पिढीला बरबाद करण्यासाठी ड्रग्जचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संगमनेरमध्ये एकीकडे सुसंस्कृत नेतृत्व आहे, तर दुसरीकडे अशांतता पसरवणारे लोक आहेत; त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या दातृत्वाचा उल्लेख करत, त्यांनी स्वतःकडील कोल्हापूरचे पालकमंत्री पद आपल्याला देऊन कार्यकर्त्यांना मोठे करण्याची वृत्ती जपल्याचे आवर्जून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब थोरात यांनी पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांना त्रास देणारी मुंबाजी प्रवृत्ती आजही आहे. निवडणूक आयोग, न्यायालय, ईडी, सीबीआय या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून देश चुकीच्या दिशेने चालला आहे. देश वाचवण्यासाठी युवकांनी आता सक्रिय व्हायला हवे, असे आवाहन करीत संविधानाचे विचार आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.
२०२४ च्या घटनेने राज्य हळहळले. आपत्तीमधून इष्टापत्ती निर्माण करायची असते. नव्याने सर्वांना बरोबर घेत पुढे जायचे आहे. तालुक्याची दिशा ठरवायची आहे. सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून जे काम करतात त्यांच्या पाठीशी गोरगरिबांची ताकद असते. आपण हिंदू आहोत पण दुसऱ्याचा द्वेष करणारे नाही.
प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी निळवंडे धरणाच्या पाण्याचे श्रेय घेणाऱ्यांचा समाचार घेत युवकांना लढण्याचे बळ दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर हनुमंत पवार यांची प्रकट मुलाखत यावेळी विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा संगम कार्यक्रम भविष्याची दिशा ठरवणारा; माजी मंत्री आमदार सतेज पाटील
संविधानाचे विचार आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याची गरज






