
संगमनेर, प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले.
थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत, मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला असून, मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत, असे ते म्हणाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित चुकीच्या वर्तनावरही त्यांनी बोट ठेवले.
सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणलेल्या तीन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आणि रद्द कराव्या लागलेल्या वर्क ऑर्डरचा संदर्भ देत, हे प्रकार कुठेही दाखवले जात नाहीत याबद्दल थोरात यांनी आश्चर्य व्यक्त केले. आमदारांचे भाऊ आता गोळीबार करू लागले आहेत, पुरोगामी विचारांचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला गेला आहे, बीडमध्ये भयानक अवस्था निर्माण झाली आहे, असे गंभीर आरोप थोरात यांनी केले. विधानभवनात गुंड शिरतात, हाणामाऱ्या करतात आणि भाजप त्यांना संरक्षण देते हे अत्यंत वाईट असल्याचेही ते म्हणाले.
लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जन सुरक्षा विधेयक या सरकारने पास करून घेतले आहे, अशी चिंता थोरात यांनी व्यक्त केली. देशामध्ये इतर राज्य पुढे जात असताना, पुरोगामी महाराष्ट्राची आता अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले.
लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक एका गाडीची दोन चाके असतात, विरोधकांचे महत्त्व मोठे आहे, असे थोरात यांनी नमूद केले. परंतु, अलीकडे विरोधकांना चिरडून टाकले जात आहे. पूर्वी निधी वाटपात कधीही दुजाभाव केला जात नव्हता, मात्र आता विरोधी आमदारांना शून्य टक्के निधी दिला जात आहे. “तो त्रास त्या आमदाराला नसून जनतेला होतोय,” असे थोरात यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कंत्राटदारांचा कामांमधील एक लाख कोटींपेक्षा जास्त निधी देणे बाकी आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या गोरगरिबांसाठी असलेल्या योजनांसाठी पैसे नाहीत, गेल्या सात महिन्यांपासून या लोकांना कोणतेही पैसे मिळत नाहीत, याकडेही थोरात यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करून सरकारनं शेतकरी व महिलांना फसवले असल्याचा आरोप थोरात यांनी केला. पैसे नसताना ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा मान्य केल्या? असा सवाल विचारत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत, आमदारही अस्वस्थ आहेत. नगर विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री ठरवणार आहेत. मंत्रिमंडळात अविश्वासाचे वातावरण असून, एका म्यानात तीन तलवारी कशा राहणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होऊन राज ठाकरे यांच्या समावेशाबाबत निर्णय होईल, असेही थोरात यांनी संकेत दिले.





थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर
लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक एका गाडीची दोन चाके असतात,