महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
अहिल्यानगर:
एका कांदा व्यापाऱ्याला ट्रान्सपोर्टद्वारे कांदा विक्री करूनही २६ लाख ४१ हजार ३७९ रुपये न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आंधळे यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केटमध्ये कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत मोहम्मद नदिम (रा. सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश), अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन आणि छोटे मिया अँड कंपनी (पूर्ण पत्ते अज्ञात) यांनी त्यांच्याकडून ट्रान्सपोर्टमार्फत वेळोवेळी कांदा खरेदी केला.
खरेदी केलेल्या कांद्याची रक्कम आरोपींनी आंधळे यांना दिली नाही. वारंवार पैशांची मागणी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंधळे यांनी पैसे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही.

त्यामुळे त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, पाच जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र डावखर करत आहेत.


