

संगमनेर, प्रतिनिधी:
शांतता, समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिरापाशी श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी या विकृत कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते घटनास्थळी आणि यशोधन कार्यालयात जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, इंद्रजीत थोरात यांनी तातडीने कार्यकर्त्यांना शांत केले. या गंभीर घटनेसंदर्भात माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीने संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “संगमनेर तालुक्याला एक सुसंस्कृत परंपरा आहे. परंतु, काही लोक जाणूनबुजून तालुक्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. विकास कामांऐवजी आता जाती-जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत आणि जातीभेदाचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यात कधीही नसलेले अशांत वातावरण निर्माण झाले आहे. फ्लेक्स फाडणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी निलेश थोरात, महेश थोरात, सागर गायकवाड, पोपट थोरात, अनिस तांबोळी, सुनील थोरात, अरुण कुळधरण, नितीन गायकवाड, रोहित गायकवाड, अभिजीत थोरात, गणेश गडगे, गणेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक काँग्रेसचा ‘रास्ता रोको’चा इशारा, प्रशासनाला जबाबदार धरले
युवक काँग्रेसचे निलेश थोरात यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “जर अशा समाजकंटकांना तातडीने अटक झाली नाही, तर युवक काँग्रेसच्यावतीने येत्या दोन दिवसांत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.”
सोशल मीडियावरही घटनेचा तीव्र निषेध
वडगाव पान येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची विटंबना झाल्याची बातमी तालुक्यात पसरताच, सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. तालुक्याचे नाव बदनाम करणाऱ्या अशा विकृत लोकांना प्रशासनाने वेळीच थांबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अन्यथा, शांत आणि संयमी असलेला संगमनेर तालुका जर पेटला, तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, अशा शब्दांत अनेक नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवला आहे.





यावेळी बोलताना गायकवाड यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
युवक काँग्रेसचा ‘रास्ता रोको’चा इशारा, प्रशासनाला जबाबदार धरले