

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
आमदार सत्यजित तांबे मित्र परिवार आणि जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यावतीने संगमनेरकरांना नागपंचमीच्या शुभेच्छा देणारा फलक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार मंगळवारी पुन्हा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात राजकीय वर्चस्वातून फ्लेक्स फाडले जात आहेत की नशेडी, गंजडी हे प्रकार करत आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या मुक्त आशीर्वादाने संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू आहे. आम्हीच कसे समाजाचे उद्धारकर्ते आहोत हे फ्लेक्स च्या माध्यमातून दाखविण्याच्या नादात राजकारण्यांनी आपल्या विकृतीचे प्रदर्शन सुरू केले आहे. ही विकृती थेट एकमेकांचे फ्लेक्स फाडण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. राज्यात सर्वत्र फ्लेक्स बंदी असली तरी संगमनेरात मात्र प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा हा कायदा थेट केराच्या टोपलीत टाकून दिला आहे. त्यामुळे सध्या संगमनेर फ्लेक्स मुक्त बनण्याऐवजी राजकीय आशीर्वादाने फ्लेक्सयुक्त बनले आहे. राजकीय दबावातून बेकायदेशीर फ्लेक्स हटविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.
राजकारण्यांमधील मतभेद हे वैचारिक न राहता ते व्यक्तिगत पातळ्यांवर येऊन ठेपल्याने संगमनेरमध्ये सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे संगमनेरचा सामाजिक राजकीय व सांस्कृतिक इतिहास बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे यातून संगमनेरात जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी राजकीय कार्यकर्त्यांऐवजी संगमनेरातील स्थानिक प्रशासनावर असणार आहे. सध्या तरी प्रशासनातील अधिकारीच या वादाला कारणीभूत ठरत असल्याचे चिन्ह दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील संगमनेरात फ्लेक्स चे नियम पायदळी तुडविले जात आहे आणि याकडे स्थानिक प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फ्लेक्स वॉर सुरू असून राजकीय देशातून एकमेकांचे फ्लेक्स फाडले जात आहे. हे फ्लेक्स फाडून काही लोक आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहे. यामुळे आता प्रशासनानेच या विरोधात ठोस पावले टाकण्याची गरज असून सुसंस्कृत संगमनेरचे बिघडणारे वातावरण थांबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दोन दिवसापूर्वी श्रावण मासानिमित्त शुभेच्छा देणारा आमदार अमोल खताळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पाठोपाठ संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे लावण्यात आलेला आमदार बाळासाहेब थोरात यांचा देखील शुभेच्छा देणारा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात देखील संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता त्या पाठोपाठ ऐन नागपंचमीच्या दिवशी मंगळवारी सकाळी शहरातील स्वामी समर्थ मंदिरापाशी लावण्यात आलेला थोरात-तांबे यांचा शुभेच्छा फलक पाडण्याचा प्रकार समोर आल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे फ्लेक्स पाडणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा शोध घेण्याचे जबाबदारी पोलीस यंत्रणेने पार पाडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.



राजकारण्यांमधील मतभेद हे वैचारिक न राहता ते व्यक्तिगत पातळ्यांवर येऊन ठेपल्याने संगमनेरमध्ये

