

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी:
महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, महसूल विभागाने ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या अभिनव उपक्रमातून सैनिकांचे प्रश्न सोडवले. त्याचबरोबर खंडकऱ्यांच्या जमिनींचे प्रश्न मार्गी लावणे, गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करणे, आणि भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करणे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व सेवा अधिक सुलभ करण्यासाठी त्या ऑनलाइनही उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्गाच्या आपत्तीच्या काळात महसूल विभागाचे कर्मचारीच सर्वात आधी मदत करतात, त्यामुळे त्यांचे काम अधिक महत्त्वाचे ठरते, असेही ते म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे लक्ष द्यावे आणि ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे स्वतःहून काढावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, काही लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, आणि जमिनीशी संबंधित विविध आदेश व कागदपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. या सप्ताहात महसूल सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले. अनेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध असून त्यात आणखी सेवांचा समावेश करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


