

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन जाहीर केले आहे. मागील १८ वर्षांत केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत या कामांना गती देण्याची ग्वाही दिली.
भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, ४० वर्षे सत्तेत राहूनही पाणी न आणणाऱ्यांना जनतेने बाजूला केले आणि महायुतीवर विश्वास दाखवला. आज आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरत आहोत. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्याच दिवशी मी इथे सभा घेईन, आणि आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही, तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे.
हे सत्तांतर केवळ विकासाचे प्रतीक नसून, जनतेच्या अपेक्षांना मिळालेले ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका जल स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगत सक्षम नेतृत्वामुळेच खरा विकास घडतो.
आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग जलसमृद्ध होत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बोलताना नीलम खताळ यांनी महिलांना पाण्यासाठी वर्षानुवर्षे सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांना आता न्याय मिळाल्याचे सांगितले. तसेच, ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांवर टीका करत कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांनी ४० वर्षांत काय केले, असा सवाल उपस्थित केला.



भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे
कार्यक्रमात बोलताना नीलम खताळ यांनी