

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर – आश्वी, प्रतिनिधी
अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली आहे. मतीन मेहबूब शेख (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.
ही घटना शुक्रवारी, (८ ऑगस्ट) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास घडली. मतीन शेख याने आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्यांच्या वडीलाकडे मागीतल्याचा राग आल्याने याच रागातून आरोपी आसिफ शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, आणि गौतम गायकवाड यांनी मतीनला प्रतापपूर शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळ गाठले.
यावेळी आरोपींची मतीनसोबत बाचाबाची केली. त्यानंतर सोहेल आंधळे, पप्पू भांड आणि गौतम गायकवाड यांनी मतीनचे हात-पाय पकडले. याच संधीचा फायदा घेत, आसिफ शेख याने मतीनच्या पाठीत खिळा खुपसून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेनंतर मतीनला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मतीनचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
या प्रकरणी, मतीनच्या आईने बिलकीस उर्फ शाकीरा महेमुद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५१/२०२५ नुसार बीएनएस २०२३ चे कलम १०३(१) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर, एका आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.





घटनेनंतर मतीनला तातडीने लोणी येथील प्रवरा