

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कुरण गावात सर्रास सुरू असलेल्या गोहत्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आज, (१४ ऑगस्ट) फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
या निवेदनात, संगमनेरमधील समस्त मुस्लिम समाजाने कुरण गावात काही व्यक्तींकडून सातत्याने होत असलेल्या गोहत्यांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रभर कुरेशी, खाटीक व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालून व्यापार व कत्तलखाने बंद ठेवले असतानाही कुरण गावात मात्र कसलीही भीती न बाळगता गोहत्या सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अनेकदा छापे टाकले असले तरीही हा प्रकार थांबत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या कृत्यांमुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. गोहत्या करणारे हे समाजकंटक असून त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, कुरणमध्ये दररोज दोन ते तीन जनावरे कापली जातात आणि त्यांची वाहतूक केवळ संगमनेरच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगळूरू अशा दूरच्या ठिकाणीही केली जाते.
या संवेदनशील विषयाची तात्काळ दखल घेऊन गोहत्या करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि कायद्याचे पालन करणारा जागरूक मुस्लिम समाज या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य देण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधिकारी आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांच्यासह शहबाज शेख, साजिद शेख, रईस शेख, गुफरान बेग, इम्रानखान पठाण, रमिज शेख, नदीम कुरेशी, सलीम शेख, जमीर बेग, विकार शेख, अब्दुलमाजिद शेख, आसिफ शेख, हाजी सरवर कुरेशी, गुड्डू इंजिनिअर, रईस शेख, शौकत पठाण आदी समाजबांधव उपस्थित होते.



या कृत्यांमुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक
