महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (२१ ऑगस्ट) एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरमधील सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, वारकरी संप्रदाय आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत.
या मोर्चाची माहिती देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या कामातून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना राज्यात आदर्श मानली जाते. अशा संयमी आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या नेत्याला धमकी देणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.
स्वाभिमानी संगमनेर तालुका यांच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही तथाकथित कीर्तनकारांनी धर्माच्या नावावर राजकीय अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. संग्राम बापू भंडारे या व्यक्तीने थोरात यांना मारण्याची धमकी दिल्यानंतर केवळ संगमनेरमध्येच नव्हे, तर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शांतता आणि संयम जपणाऱ्या संगमनेरकरांचा इशारा- संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा आणि संघर्षाचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांची शांतता आणि संयम ही ओळख आहे. जर कोणी या शांततेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा अनेक युवक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या निषेध मोर्चात सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक मंडळे, गणेश मंडळे, संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी मंडळ, अध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना), आरपीआय, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी यांसारख्या विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानक असा हा मोर्चा सकाळी ९ वाजता सुरू होईल.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्म-जातीच्या नावावर अशांतता पसरवणे सहन केले जाणार नाही, असा संदेश या मोर्चातून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संगमनेरकर, हिंदू समाज, युवक आणि महिला संघटनांना या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संग्राम भंडारेला कठोर शिक्षा करा- संग्राम भंडारे हा कीर्तनकार नसून, एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप विविध स्तरांतून होत आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून तो समाजात तेढ निर्माण करत आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध करत, संग्राम भंडारेला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायाचा असा अपमान करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही हिंदू संघटनेने पाठिंबा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.





शांतता आणि संयम जपणाऱ्या संगमनेरकरांचा इशारा-
संग्राम भंडारेला कठोर शिक्षा करा-