संगमनेर –
एका हल्ल्याने तालुक्याचा आमदार बदलला आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन करत आपणही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, खताळ यांच्यावर झालेली घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. तसेच याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज, शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
विखे म्हणाले, तालुका दहशतीखाली ठेवण्यासाठी विरोधकांचा कार्यक्रम करायचा हा प्रकार अनेक वर्षे संगमनेर तालुक्यात झालेला आहे. पराभवाचे दुःख त्यांना अजूनही पचवता येत नाही. लोकशाही मान्य नसल्याने ते आता ठोकशाहीवर आले आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच लोकांनी त्यांना घरी बसवले. तसेच वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्याची आपलीही तयारी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ला चढवला.
कीर्तनकारापाठोपाठ आमदारावर हल्ला करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला. याच दहशतीच्या विरोधात आमदार खताळ उभे आहेत. तालुक्याच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला आहे. त्यांनी वर्षानुवर्ष तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले, मात्र, आपण विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार तालुक्याच्या सर्व भागात पाणी फिरवून तालुका दुष्काळमुक्त केला. हेच त्यांना पाहवत नसल्याने त्यांचे खरे रूप कालच्या घटनेतून तालुक्याला कळले आहे.
आमदार खताळ म्हणाले, कोणाच्या तरी हस्तकाने आपल्यावर हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याने आपण खचणार नाही अथवा विचलितही होणार नाही. सध्या उत्सवाचे दिवस सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक न करता शांतता ठेवावी. पोलीस योग्य तपास करून सत्य सर्वांसमोर आणतील. आमदार लंघे यांनीही या घटनेचा निषेध केला. श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, आप्पा केसेकर, शौकत जहागीरदार आदींची यावेळी निषेधपर भाषणे झाली.
मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केला निषेध
मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



संगमनेर – 
विखे म्हणाले,
मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह