संगमनेर-
पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सुनिताताई देशपांडे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अमृत सांस्कृतिक मंडळाने ‘सुंदर मी होणार’चा हृदयस्पर्शी, हृदय हेलावून टाकणारा नाट्यप्रयोग सादर केला. या नाटकाने संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवामध्ये सादर झालेल्या या नाटकासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदीप दिघे, सांस्कृतिक मंडळाचे संचालक भारत देशमुख, बबन सावंत, अनिल पाटोळे, संजय मांडे, विलास जोंधळे, अनिल मोकळ, अनिल वरपे, दिलीप तांबे, राजू बड, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, विक्रम खबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाल्यानंतर एका राजघराण्यातील जीवनशैली, मुलांवरील बंधने आणि त्यातून होणारी घुसमट, तसेच विराजस ओढेकर आणि सुरजन देशपांडे यांनी केलेले बंड, वडिलांचे आपल्या दिव्यांग सुजा प्रभू देसाई मुलीवर असलेले प्रेम, आणि अद्यापही राजघराण्याच्या थाटात वावरणारे ‘खालसाधिपती’ यांचा काळ अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला.
आई गेल्यानंतर मुलांच्या संगोपनासाठी डॉक्टरची भूमिका साकारणारे विद्याधर जोशी आणि ‘राजा’ची दमदार भूमिका करणारे अभिजीत चव्हाण यांचा अभिनय विशेष कौतुकास्पद होता. या नाटकातील अभिनय, संवाद, वेशभूषा आणि प्रकाशयोजनेने उपस्थितांना खिळवून ठेवले. यात ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, अमोल बावडेकर, सुजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर, आस्ताद काळे, आणि सुजा प्रभू देसाई या दिग्गज कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे. नाटकातील प्रत्येक संवाद हृदयाला भिडणारा आहे. नाटक ही एक जिवंत कला असून, राज्यभरातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम येथे होत आहे, याचा आनंद आहे. संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो आणि अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ही संगमनेरच्या रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे.
अभिनेते अभिजीत चव्हाण यांनी बाळासाहेब थोरातांचे कौतुक करत म्हटले की, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा बाळासाहेब थोरात यांनी जपला आहे. त्यांनी नेहमीच संत आणि कलाकारांचा आदर केला आहे. थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांना मोठा आदर आहे, नाटक ही केवळ मुंबई-पुण्यासारख्या महानगरांपुरती मर्यादित न राहता आता जिल्हा आणि तालुका स्तरावरही त्याला मागणी वाढत आहे.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक साखर कारखान्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम बंद केले आहेत, अशा परिस्थितीतही थोरात सहकारी साखर कारखान्याने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपली समृद्ध परंपरा जपली आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर रामदास तांबडे यांनी आभार मानले. या नाटकाचा आनंद घेण्यासाठी कारखाना परिसरासह संगमनेरमधील अनेक नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवात ‘सुंदर मी होणार’ नाटकाने संगमनेरकर मंत्रमुग्ध
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक साखर कारखान्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम बंद केले आहेत, अशा परिस्थितीतही थोरात सहकारी साखर कारखान्याने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपली समृद्ध परंपरा जपली आहे



संगमनेर-
आई गेल्यानंतर मुलांच्या संगोपनासाठी डॉक्टरची भूमिका साकारणारे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.
