संगमनेर – अनंत पांगारकर
संगमनेरमध्ये पोलिसांचा असलेला धाक पूर्णत: संपला आहे, याची परिणती शहरात घडलेल्या घटनांवरून वारंवार येत असतानाच आता शहरातील श्रीरामनगर भागात आठ जणांच्या टोळक्याने हप्त्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून एका कार दुरुस्ती व्यावसायिकाला धमकावत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर याच टोळक्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेले.
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत टोळक्यातील तीन मुख्य आरोपी धीरज राजेंद्र पावडे (वय २३), संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २४) आणि दीपक सोमनाथ वैराळ (वय २३) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत.
श्रीरामनगर येथे ‘बालाजी कार रिपेअरिंग’ नावाचे दुकान असलेले व्यावसायिक शहाणे हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांच्यासोबत दुकानात बसले होते. त्याच वेळी, सात-आठ तरुणांचे टोळके त्यांच्या दुकानात आले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात कोयता होता.
टोळक्याने शहाणे आणि भुजबळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यातील धीरज पावडे याने कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला हप्ता (खंडणी) चालू करायचा, नाहीतर दुकान जाळून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर, दोन आरोपींनी मॅनेजरच्या काउंटरमधून १० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढली. एवढ्यावरच न थांबता, धीरज पावडेने शहाणे यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही लंपास – व्यावसायिकाला लुटल्यानंतर, याच टोळक्याने जवळच जिजामाता उद्यानाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या भाग्यश्री दिलीप गायकवाड यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रही हिसकावून नेले.
या दोन्ही घटनांबाबत शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे, दीपक वैराळ, संदीप वाल्हेकर उर्फ जब्या, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
पुण्याचे लोन पोलिसांच्या कृपेने संगमनेर शहरातही पोहोचले आहे. थेट कोयत्याच्या सहाय्याने व्यावसायिकाला धमकावल्याची घटना समोर आली आहे तर यापूर्वी देखील शहरात कोयत्याचा धाक दाखवून गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या असल्याने पोलिसांची गोपनीय शाखा तसेच डीबी (गुन्हे शोध पथक) नेमके काय करते, शहराच्या कायदा सुव्यवस्थेला वाधा पोहोचविणाऱ्यांवर वेळीच कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील शहरात गुन्हेगारीच्या घटना घडल्या असून यावर नियंत्रण आणण्यास तत्कालीन पोलीस उप अधीक्षक व सध्याचे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांना यश आले होते, मात्र त्यांची बढतीवर बदली झाल्यानंतर संगमनेरात आलेल्या नवीन अधिकाऱ्यांमुळे संगमनेर पुन्हा गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. संगमनेर पोलिसांचा कल गुन्हे दाबण्याकडे दिसत असून दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी देखील टाळाटाळ केली जाते. तर काही ठराविक मर्जीतील पत्रकारांना मात्र थेट महिलांविषयी गुन्ह्याच्याच नव्हे तर अन्य सर्वच गुन्ह्यांच्या एफआयआर देखील पोलीस ठाण्यातून पाठविल्या जातात, काही पत्रकारांना माहिती द्यायची आणि काही पत्रकारांना द्यायची नाही, यातून संगमनेर पोलिसांना नेमका काय संदेश द्यायचा आहे याचा उलगडा होत नाही.
संगमनेरमध्ये व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही केले लंपास; आठपैकी तिघे पकडले
थेट कोयत्याच्या सहाय्याने व्यावसायिकांना धमकावण्याच्या घटना समोर आली आहे तर यापूर्वी देखील शहरात कोयत्याचा धाक दाखवून गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या असल्याने पोलिसांची गोपनीय शाखा तसेच डीबी (गुन्हे शोध पथक) नेमके काय करते, शहराच्या कायदा सुव्यवस्थेला वाधा पोहोचविणाऱ्यांवर वेळीच कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



संगमनेर – अनंत पांगारकर
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही लंपास –
