संगमनेर –
वारकरी संप्रदायात पांढरे कपडे घालून काही ‘मंबाजी’ घुसले असून, तुकाराम महाराजांना त्रास देणारी ही प्रवृत्ती आजही शिल्लक आहे. अशा ढोंगी लोकांना शोधून संप्रदायाबाहेर काढले पाहिजे, असे परखड मत संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत ज्येष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले. यासोबतच, संयोजकांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करून तिचे पालन करणे अनिवार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते, तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, ‘रिंगण’चे संपादक सचिन परब, आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर, व्यंकटेश महाराज सोनवणे यांचीही उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात बोलताना ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक असून, कोणाचीही निंदा, द्वेष किंवा तिरस्कार करणारा नाही. परंतु, दुर्दैवाने आज या संप्रदायात जात-धर्मावरून विषमतेचे फुत्कार टाकले जात आहेत. वारकरी संतांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या कीर्तनकार, फडकरी आणि दिंडेकरी यांनी एकत्र येऊन अशा वेशात घुसलेल्या ‘मंबाजीं’ना शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख चोपदार राजाभाऊ चोपदार यांनी वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्यावर भाष्य करताना सध्याच्या बदलत्या कीर्तन पद्धतीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कीर्तनकाराची भाषा बदलण्यासाठी कीर्तनकार जितके जबाबदार आहेत, तितकेच संयोजकही जबाबदार आहेत. ज्यांना वारकरी संप्रदाय टिकवायचा आहे, त्यांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करून आपल्या मंदिरात लावावी. एखाद्या सप्ताहात एकाच अभंगावर सात दिवस सात महाराजांनी कीर्तन करण्याचा प्रयोग केल्यास वारकरी संतविचारांचा चिकित्सक अभ्यास करण्यास मदत होईल.
डॉ. बालाजी जाधव यांनी सध्याच्या कीर्तनांमध्ये आलेले बाष्कळ विनोद आणि टिंगल-टवाळी टाळण्याचे आवाहन केले. कीर्तन परंपरा संतांनी घालून दिलेल्या समतेच्या विचारांवर आधारित असावी. जाती-धर्मावरून द्वेष करणारा व्यक्ती खरा वारकरी कीर्तनकार असू शकत नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना भारत महाराज जाधव यांनी ‘सर्वधर्म समभाव’वर आक्षेप घेणाऱ्या कीर्तनकारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सर्वांप्रती समभाव असणे हाच खरा वारकरी धर्म आहे. ज्यांना हे मान्य नाही, तो वारकरी असू शकत नाही. म्हणूनच, सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करावी आणि सर्वांनी तिचे पालन करावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी केले, पसायदान समाधान महाराज देशमुख यांनी, तर आभार बाळकृष्ण महाराज कर्पे यांनी मानले. या यशस्वी आयोजनामध्ये राजाभाऊ आवसक, अविनाश पाटील, शरद कदम, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, रजत आवसक, राजेंद्र शित्रे, आणि जयवंत भोंडवे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
वारकरी संप्रदायात घुसलेल्या ‘मंबाजीं’ना शोधून काढणे गरजेचे: संगमनेर येथील वारकरी चिंतन परिषदेत ज्येष्ठांचे मत
सर्वांप्रती समभाव असणे हाच खरा वारकरी धर्म आहे. ज्यांना हे मान्य नाही, तो वारकरी असू शकत नाही. म्हणूनच, सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करावी आणि सर्वांनी तिचे पालन करावे.



संगमनेर –
उद्घाटनपर भाषणात बोलताना ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणाले की,
अध्यक्षीय समारोप करताना भारत महाराज जाधव यांनी