पुणे –
मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातारा शहरात यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या शतकाच्या उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, विश्वास पाटील यांच्या योगदानाचा आणि मराठी साहित्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कामाचा विचार करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचा हातखंडा मानला जातो. त्यांची ‘पानिपत’ ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. त्यामुळे साताऱ्यातील या संमेलनात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित साहित्यिक चर्चांना विशेष महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विश्वास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सातारा ही थोरल्या शाहू महाराजांची भूमी असून, ब्रिटिशांनी हद्दपार केलेल्या प्रतापसिंह महाराजांची स्मृतीस्थळे या ठिकाणी असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे त्यांच्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इतिहासाबरोबरच साताऱ्याची समृद्ध साहित्यिक परंपराही प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले. कोरेगावचे ना. ह. आपटे आणि वाटेगावचे अण्णाभाऊ साठे यांसारखे साहित्यिक आणि समाजपुरुष साताऱ्याच्याच भूमीतील आहेत. पाचगणी येथे शालेय जीवनात वाचनालयातील अनेक पुस्तके वाचल्यानेच आपल्या विचारविश्वाला दिशा मिळाली आणि लेखनाची गोडी लागली, असे त्यांनी नमूद केले.
यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली ग्रंथालय चळवळ पुन्हा जोमाने उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फक्त एक गाव पुस्तकाचे गाव बनवून चालणार नाही, तर प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी ‘पुस्तकाचे गाव’ उभे राहिले पाहिजे. वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही चळवळच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक उन्नतीची खरी दिशा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील
इतिहासाबरोबरच साताऱ्याची समृद्ध साहित्यिक परंपराही प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले.



पुणे – 
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विश्वास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
