संगमनेर –
महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था वाईट अवस्थेत असताना, संगमनेरमधील सहकार मात्र उत्कर्ष करत आहे. या यशाचे श्रेय राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाला असून थोरात यांनी राजकारणापलीकडे जाऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकाराला प्राधान्य दिले. थोरात यांनी यापुढील काळात राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी नेतृत्व म्हणून राज्य पातळीवर काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी यावेळी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, केंद्रात व राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असताना सुद्धा येथील सहकाराचे श्रेष्ठत्व कोणीही नाकारू शकलेले नाही. हे जे काम घडत असतं यामागे कणखर नेतृत्व असते. हे संगमनेरकरांनी लक्षात घेण्याची गरज आहे. संगमनेरमधील सहकार चळवळीने देशात आदर्श निर्माण केला असून, हा बदल घडवून आणण्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे.
एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेल्या संगमनेर तालुक्यात, थोरात यांनी आमदार झाल्यावर भंडारदरा धरणाचे ३० टक्के पाणी तालुक्यासाठी मिळवले. याशिवाय, निळवंडे धरणाचे ४० टक्के पाणी देखील संगमनेरला मिळाल्यामुळे शेतीत क्रांती झाली. निळवंडे धरणाचे काम थोरात यांनी पूर्ण केले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जमिनी सुपीक झाल्या, ज्यामुळे परिसरातील आर्थिक स्थिती सुधारली.
थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार चळवळ हे एक असे मॉडेल आहे, जे केवळ शेतीपुरते मर्यादित नाही. इथे सहकारी साखर कारखाने आणि दूध संघांसारख्या संस्थांनी मोठी प्रगती केली आहे. या संस्थांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, शिक्षण क्षेत्रातही मोठे काम झाले असून, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्थांमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
राज्यात सहकाराचे संवर्धन संगमनेरमध्ये होत असल्याचे गौरव करत संगमनेर मधील सहकारातील संस्थांच्या या यशाचे श्रेय थोरात यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाला जाते. कमी बोलून जास्त काम करणे, हे थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे तांबे म्हणाले. थोरात यांच्या भक्कम नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाले. त्यांनी असाही उल्लेख केला की, शरद पवार आणि अजित पवार यांसारख्या मोठ्या नेत्यांनीही संगमनेरच्या सहकार चळवळीची प्रशंसा केली आहे.
केवळ राजकारण नाही, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी बाळासाहेब थोरातांचे सहकाराला प्राधान्य- माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
शरद पवार आणि अजित पवार यांसारख्या मोठ्या नेत्यांनीही संगमनेरच्या सहकार चळवळीची प्रशंसा केली आहे.

