संगमनेर – मोहसीन शेख
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले.
काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा एक शांततापूर्ण मार्ग होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी या तरुणांवर एफआयआर दाखल केली.
या कारवाईला मुस्लिम समुदायाने संविधानाच्या अनुच्छेद 19 (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि 25 (धार्मिक स्वातंत्र्य) चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरातील मुस्लिम समुदायामध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी निषेध, प्रदर्शने होत आहेत.
या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात, संगमनेरच्या मुस्लिम समाजाने आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या. यात त्यांनी कानपूर येथे दाखल केलेली एफआयआर त्वरित रद्द करून, अटक केलेल्या तरुणांना तात्काळ मुक्त करावे अशी मागणी केली. तसेच, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, त्यांनी कोणत्या कायदेशीर आधारावर ही कृती केली, याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांवर पक्षपाती आणि अल्पसंख्याकविरोधी कारवाईचा आरोप असल्याने त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
शेवटी, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, यामुळे नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क जपले जातील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडल्या. निवेदनात, जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढील संवैधानिक पावले उचलण्यास भाग पडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
कानपूरच्या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात मुस्लिम समाजाचा मोर्चा, या केल्या मागण्या!
जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढील संवैधानिक पावले उचलण्यास भाग पडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



संगमनेर – मोहसीन शेख
काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात
या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात,
मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी