अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धरण विसर्ग वाढल्याने नदीकाठी पूरस्थितीचा धोका- पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना विशेषतः सतर्क राहण्याचे आणि पाणीपातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर धरणातून ९,४६५ क्युसेक तर भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,९४० क्युसेक इतका प्रचंड विसर्ग सुरू आहे. याशिवाय प्रवरा, मुळा, घोड, सीना या प्रमुख नद्यांवरील धरणांमधूनही मोठा विसर्ग सोडला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
- वीज आणि वादळ: मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेचे सुवाहक भाग (उदा. धातूचे कुंपण, टॉवर्स, खांब) यांच्यापासून दूर राहावे. मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावे आणि डोके गुडघ्यांमध्ये झाकावे, जेणेकरून जमिनीशी कमीतकमी संपर्क होईल.
- नदी-नाले आणि प्रवास: नदी, ओढे व नाल्यांवरील पूल किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते कोणत्याही परिस्थितीत ओलांडू नये. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणे टाळावे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास शक्यतो टाळावा.
- इतर दक्षता: जुनाट/मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये किंवा जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये. पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि पूरस्थितीचा धोका!
जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
सध्या गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणातून
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या