
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी परिसरात ऑनलाईन फसवणुकीने थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ग्राहक सेवा केंद्र चालक, मेडिकल व्यावसायिक, शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनेकांना सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर, आश्वी खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका ताज्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गावातील एका जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ‘भाडेकरू’ असल्याचे भासवून तब्बल १९,००० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
पीडित कर्मचारी जेवण करत असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने, मी तुमच्या रूमचा भाडेकरू बोलतोय, माझा फोन पे नंबर बंद आहे. माझा मित्र हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला अर्जंट १९ हजार रुपये पाठवा, मी तुम्हाला दहा मिनिटांत पैसे परत करतो, अशी भावनिक विनंती केली. या खोट्या आणि तातडीच्या आर्जवाला बळी पडून, पीडितांनी सुरुवातीला तीनदा ५,००० रुपये (एकूण १५,०००) ट्रान्सफर केले.
यानंतर, फसवणूक करणाऱ्या भामट्याने पैशाचा खोटा स्क्रीनशॉट पाठवला आणि QR कोड शेअर करून आणखी पैसे भरण्यास सांगितले. यावर विश्वास ठेवून पीडितांनी पुन्हा दोनदा २,००० रुपये ट्रान्सफर केले. तिसऱ्या प्रयत्नात व्यवहार अडकल्यानंतर त्यांनी खात्यातील शिल्लक तपासली आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे वयोवृद्धाच्या लक्षात येताच भामट्याने व्हॉट्सअप मेसेजेस तत्काळ डिलीट केले आणि फोन बंद केला. पीडितांनी तात्काळ आश्वी पोलिस ठाणे गाठले असता, पोलिसांनी त्यांना फक्त ‘सायबर क्राईम ऑनलाईन पोर्टलवर’ तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बहाणे बदलले, फसवणूक कायम… आश्वी परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना जाळ्यात ओढण्यात आले आहे. ‘मी पीएसआय राऊत बोलतोय,’ ‘मी आश्वी आरोग्य केंद्रातून डॉ. सोमाणी बोलतेय,’ किंवा ‘मी स्टेट बँकेतून बोलतोय, तुमचे क्रेडिट कार्ड बिल थकले आहे,’ अशा विविध बहाण्यांनी नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे. कर्ज न घेतलेल्या व्यक्तींनाही दंडाची भीती दाखवून पैसे उकळल्याच्या घटना येथे नोंदल्या गेल्या आहेत.
वाढत्या तक्रारी, थंडावलेली कारवाई!… ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असताना, फसवले गेलेल्या नागरिकांना मात्र न्याय मिळत नसल्याची तीव्र भावना आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात गेल्यावर ‘सायबर ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दाखल करा,’ या एकाच उत्तरावर बोळवण केली जाते. त्यानंतर या तक्रारींवर कोणतीही ठोस आणि जलद कारवाई होत नाही. ठोस तरतूद आणि त्वरित कार्यवाहीचा अभाव असल्यानेच या भामट्यांचे मनोबल वाढत आहे आणि ऑनलाइन फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा: सावधगिरी हीच सुरक्षा!… फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी, विशेषतः अनोळखी व्यक्तीसोबत, खात्री केल्याशिवाय व्यवहार करू नका. अनोळखी लिंक, QR कोड किंवा संशयास्पद नंबरवर व्यवहार टाळा.




पीडित कर्मचारी जेवण करत असताना त्यांना एका अनोळखी
फसवणूक झाल्याचे वयोवृद्धाच्या लक्षात येताच भामट्याने
वाढत्या तक्रारी, थंडावलेली कारवाई!…