
संगमनेर – संगमनेर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणगाव, शिवापूर, मेंढवन आणि सावरगाव तळ परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यांवरील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे, तसेच दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या संसाराला मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार खताळ यांना कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळल्याची माहिती मिळताच, त्यांनी कोणताही विलंब न करता अधिकाऱ्यांसमवेत कोकणगाव आणि शिवापूर येथील संजय भोसले यांच्या वस्तीवर धाव घेतली. त्यांनी ओढ्याच्या पाण्यातून पायी चालत जाऊन पडलेल्या घराची पाहणी केली.

याच परिसरातील शेतकरी अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे, तर बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. आमदार खताळ यांनी पडलेल्या घरांचा त्वरित पंचनामा करून, या नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत कशी मिळेल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील म्हसोबा ते माळेगाव मार्ग तसेच अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी खताळ यांना निवेदन देऊन, अमृतेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्याम मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, भाजपचे हिरामण वायकर, घनश्याम भोसले, लक्ष्मण घोडे, भारत जोंधळे, रामेश्वर जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, आदिनाथ पवार, महेश जोंधळे यांच्यासह कोकणगाव, शिवापूर, माळेगाव हवेली व वडगाव पान येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

