संगमनेर – ब्रिटन आणि जपानलाही मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था २०२५ च्या मध्यात ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने भारत एक आश्वासक गुंतवणूक केंद्र बनला आहे. याच बळावर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) नुसार म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (AUM) ७५.१९ लाख कोटींवर पोहोचली असून, महिन्याला एसआयपी (SIP) द्वारे येणारी रक्कम २८,२६५ कोटी असल्याने, हा उद्योग लवकरच शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर असेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले.
‘सहकारातून समृद्धी’ या अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ या विशेष अर्थसाक्षरता कार्यशाळेचे सोमवारी (२९ सप्टेंबर) कारखान्याच्या गेस्ट हाऊस कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत कर्मचाऱ्यांनी अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले आणि गुंतवणुकीचे प्रभावी मार्ग समजून घेतले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची व म्युच्युअल फंड उद्योगाची सध्याची मजबूत स्थिती स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एन. जे. वेल्थचे शुभम कोळी आणि व्हाईट ओक असेट मॅनेजमेंटचे मार्तंड पंढरकर उपस्थित होते.
कडलग यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घुलेवाडीच्या माळरानावर नंदनवन फुलवून संगमनेर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला सक्षम केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अर्थकारणाला सहकार चळवळीने बळकट केले आहे, यामुळे इक्विटीमध्ये पैशांचा ओघ वाढत आहे.
ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असल्याने भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र बनले आहे. ब्रिटन, जपानलाही मागे टाकत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाने (GDP) ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे यश २०२५ च्या मध्यात प्राप्त केले. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गुंतवणुकीचा यशाचा मार्ग स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) माध्यमातून संपत्ती निर्माण करणे आणि स्वॅप (SWP) च्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवणे हा उत्तम मार्ग आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला की, वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी आता बँकेच्या मुदतठेवी (Fixed Deposits) अपयशी ठरल्या आहेत. त्यांना सुरक्षित ऐवजी ‘ऋण परतावा’ (Negative Return) मिळत असल्याने ‘धोकादायक सुरक्षित’ म्हणावे लागत आहे. त्यामुळे, महागाईवर मात करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल.
यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कमी किमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक भाषणात कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या अर्थसाक्षरतेच्या महत्त्वास अधोरेखित केले. ते म्हणाले, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सल्लागारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. कर्मचारी आणि शेतकरी अर्थसाक्षर झाल्यास त्यांचे जीवन संपन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी अशोक कवडे, किशोर देशमुख, शरद देशमुख, सतीश मौर्य, अनिल पाटोळे, भारत देशमुख, बापुसाहेब शिंदे, महेश खैरे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कडलग आणि घुगरकर यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यशाळेसाठी कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, अमोल दिघे, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे, संजय पाटील, भाऊसाहेब खर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर देशमुख यांनी केले, तर अनिल पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ कार्यशाळा… ब्रिटन-जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: अर्थतज्ज्ञ सुनील कडलग
अध्यक्षस्थानी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एन. जे. वेल्थचे शुभम कोळी आणि व्हाईट ओक असेट मॅनेजमेंटचे मार्तंड पंढरकर उपस्थित होते.



संगमनेर – 
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी
कडलग यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांनी
गुंतवणुकीचा यशाचा मार्ग स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की,
कार्यक्रमाच्या शेवटी