संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज केवळ देशालाच नाही, तर जगालाही गरज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार घेऊन एक मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
जयहिंद लोक चळवळीच्यावतीने महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित भव्य प्रभात फेरीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, जुलमी ब्रिटिशांविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब नागरिकांना एकत्र आणून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज जगात व देशात अस्वस्थता असून, देशात द्वेष पसरवला जात आहे आणि जाती-धर्माच्या नावावर भांडणे लावून राजकारणाची पोळी भाजली जात आहे. यामुळे लोकशाही आणि राज्यघटना संकटात आली आहे. त्यामुळे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन ही लोकचळवळ उभी करणे गरजेचे आहे. थोरात यांनी यावेळी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाने स्वीकारलेले शांतता आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यांच्यावर जगात सर्वाधिक म्हणजे सुमारे १ लाख ५ हजार पुस्तके लिहिली गेली असून, ७० देशांमध्ये त्यांचे पुतळे आणि १०५ देशांमध्ये त्यांच्यावर तिकिटे काढली गेली आहेत. गांधीजींमुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सन्मान मिळतो. त्यांनी युवकांना गांधीजींचे विचार घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पारखे व नामदेव कहांडळ यांनी केले, तर जयहिंदचे सचिव डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले.
महात्मा गांधींच्या वेशातील २०९ विद्यार्थ्यांची लक्षवेधक प्रभात फेरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. विविध विद्यालयांमधील २०० विद्यार्थ्यांनी यावेळी महात्मा गांधींची वेशभूषा केली होती, तर एकूण ७०० विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानकापर्यंत निघालेल्या या प्रभात फेरीत महात्मा गांधींच्या घोषणांसोबतच त्यांच्या भजनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर बस स्थानकावर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, वैष्णव जनतो तेरे नाम, आणि रघुपति राघव राजाराम या भजनांनी शहर दुमदुमून टाकले.



संगमनेर – 
थोरात म्हणाले की,
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले.