संगमनेर: गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, संघटनेने थेट नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH 60) रोखण्याचा इशारा दिला आहे. सरकारला स्पष्ट शब्दांत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर ‘चक्का जाम’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे.
गोवंश हत्या बंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी ४ ऑक्टोंबर) संगमनेर येथील दुर्वे नाना हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायद्यातील जाचक तरतुदी दूर कराव्यात, भाकड (दूध न देणाऱ्या) जनावरांची योग्य दरात खरेदी करण्याची सरकारी यंत्रणा कार्यान्वित करावी आणि पशुधन सांभाळणाऱ्या गोपालक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्यांवर सखोल चर्चा झाली. सरकारने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनाला आता महिलांच्या सहभागाने एक नवी ‘धार’ मिळाली आहे, कारण शेतकरी कुटुंबातील महिलांनी यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे. बैठकीत महिलांनी आपली भूमिका मांडत, मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या या तयारीमुळे आंदोलनाची तीव्रता आणि व्याप्ती वाढणार असल्याचे दिसून येते.
जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कायद्यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले नाहीत, तर आम्ही शांत बसणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा संघटनेच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आता नाशिक-पुणे महामार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास, संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही क्षणी महामार्गावर उतरून वाहतूक पूर्णपणे ठप्प करतील. या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवाशांचे आणि माल वाहतुकीचे मोठे हाल होण्याची भीती आहे.
शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या या कडक इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय उपाययोजना करते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गोवंश हत्या बंदीमुळे शेतकरी आक्रमक! शिव आर्मी शेतकरी संघटनेचा नाशिक-पुणे महामार्ग रोखण्याचा ‘अल्टीमेटम’
या आंदोलनाला आता महिलांच्या सहभागाने एक नवी 'धार' मिळाली आहे, कारण शेतकरी कुटुंबातील महिलांनी यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.



संगमनेर: 
या आंदोलनाला आता महिलांच्या सहभागाने एक नवी ‘धार’ मिळाली आहे,
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आता