सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक वस्तू काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. त्यातीलच एक म्हणजे ‘सार्वजनिक फळा’. काळानुसार लोकांची गरज संपते आणि ही ठिकाणे किंवा वस्तू दुर्लक्षित होतात. पण एक काळ असा होता, जेव्हा सार्वजनिक फळा केवळ एक लाकडी बोर्ड नव्हता, तर लोकांच्या भावनांना व्यक्त करणारा आणि जनमत तयार करण्याचे एक महत्त्वाचे साधन होते.
हा सार्वजनिक फळा आठवण्याचे कारण म्हणजे काल-परवा घडलेला एक प्रसंग. माळी पंचांच्या मारुती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एक खूप जुना सार्वजनिक फळा होता, ज्याला आम्ही हल्ली ‘मरण वार्ता देणारा फळा’ म्हणायचो. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नवीन कारभाऱ्यांनी तो काढून टाकला. या घटनेने साठीच्या पुढे गेलेल्या आमच्या पिढीला एक गोष्ट स्पष्ट झाली: आम्ही, याच सार्वजनिक फळ्यांना बोलके करत, लोकभावनेला समाज बांध देत ‘सार्वजनिक व्यक्तिमत्व’ म्हणून घडलो आणि सामाजिक व सार्वजनिक होत राहिलो.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक बोलक्या फळ्यांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. लोकसंपर्कासाठी त्या काळात जी काही मर्यादित साधने उपलब्ध होती, त्यात सार्वजनिक फळा हे प्रमुख माध्यम होते. सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक फळ्याची संकल्पना कधी रूढ झाली, हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु तो निर्माण करणारा नक्कीच माध्यम तज्ज्ञ म्हणायला हवा.
माझ्या मते, ही संकल्पना स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात असताना, सन १९४० ते १९४५ च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात अस्तित्वात आली असावी. राष्ट्र सेवा दलाचे जुने अहवाल चाळताना १९४२ च्या आंदोलनात संगमनेर शहर आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक फळ्यांचा उल्लेख आढळतो. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, भास्करराव दुर्वे नाना यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर, अकोले आणि अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे केंद्र बनले होते.
या चळवळ्या मंडळींनी लोकसहभाग वाढावा, लोकसंपर्क सतत राहावा आणि स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक फलक व राष्ट्रीय ध्वजासाठी ध्वजस्तंभ उभारल्याचे दिसून येते.
मला आजही आठवते, रंगारगल्लीतील भडंग बाबा मशिदीजवळ असलेला ध्वजस्तंभ आणि त्याला लागून मशिदीच्या भिंतीवरचा सार्वजनिक फळा भूकंपापर्यंत अस्तित्वात होता. या फळ्यावर स्वातंत्र्यसैनिक एल. के. परदेशी सुलेखन करीत, तर राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते दीनानाथ मिसाळ आणि शिवलाल पाथरवट त्याची काळजी घेत.
खंडोबा मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीला लागून तसेच मेनरोडवर (आत्ताचा साईनाथ चौक) डॉ. अनिल राठी यांच्या घराला लागूनही सार्वजनिक फलक व ध्वजस्तंभ होते. सेवादल सैनिक दशरथ कळसकर, बाबुराव पाटसकर, रामकृष्ण बोराडे, बंडोपंत अवचट, मोहनशेठ करवा यांसारखी मंडळी या फळ्यांवर दैनंदिन सुलेखन व देखभाल करत असत.
अशोक चौकातील मणियार यांच्या जुन्या सायकल दुकानाला लागून असलेला सार्वजनिक फळा खऱ्या अर्थाने ‘बोलका’ होता. राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेल्या तरुणांनी स्थापन केलेल्या अशोक मंडळाच्या माध्यमातून या फळ्याचा उपयोग अनेक समाजोपयोगी उपक्रमांसाठी होत असे. राजा अशोकाच्या दृष्टिकोनातील सार्वभौम भारत आणि संत तुकाराम महाराजांच्या ‘जे का रंजले गांजले…’ या व्यापक मानवतावादी दृष्टीला अनुसरून या मंडळाने मोठे कार्य केले. १९७२ च्या भीषण दुष्काळात संगमनेरच्या शहरी गोरगरीब जनतेला अशोक मंडळ मोठा आधार ठरला होता. तसेच, अशोक मंडळ हॉल हे संगमनेरमधील कदाचित पहिले सार्वजनिक सभागृह असावे, जिथे लोकांना एकत्र येण्यासाठी बंदिस्त जागा उपलब्ध होती.
अशोक मंडळाचा सार्वजनिक फळा अतिशय मोक्याच्या ठिकाणी होता. एसटी स्टँड, अकोले नाका, दिल्ली नाका, देवी गल्ली व रंगारगल्ली या परिघात सीमित झालेल्या शहरातील प्रत्येक माणूस दिवसातून एकदा तरी अशोक चौकातून जात होता आणि त्याचे लक्ष या बोलक्या फळ्याकडे वेधले जायचे. त्याकाळी फळा हेच सार्वजनिक संवादाचे मापक साधन होते. या फळ्याशी सार्वजनिक क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या आज साठी ओलांडणाऱ्या कार्यकर्त्यांचे दृढ नाते होते. अशोक चौकातला हा फळा अनेक सामाजिक, राजकीय घटना आणि भावना लोकांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा माध्यम दुवा होत
राष्ट्र सेवा दल, छात्र भारती यांसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या फळ्याचा वारंवार उपयोग केला. पत्रकापासून ते छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या सूचना देण्यासाठी आम्ही या फळ्याचा मनसोक्त वापर केला. सुलेखन आणि चित्रकलेच्या अंगाने फळ्यावरील आकर्षक रचना, लक्ष वेधून घेणारी मांडणी आणि रंगसंगतीचा एक मापदंडच आम्ही त्याकाळी निर्माण केला होता.
८०-८५ च्या दशकात माध्यम संवाद साधनांची वानवाच होती. अगदी ९० पर्यंत रेडिओ हे एकमेव दूरवर पोहोचलेले माध्यम होते, पण तेही सर्वांना परवडणारे नव्हते. त्यामुळे आकर्षक रंगसंगती आणि मांडणी करून सार्वजनिक फलक रंगवणारे तळमळीचे कार्यकर्ते हे माध्यम दूताचे कार्य करत होते. सिद्धार्थ हायस्कूलच्या चौकात पट्टी, खडू, पाणी आणि फडके ही साधने सहज उपलब्ध असायची. खडूची बचत करायची हे सामाजिक भान या सार्वजनिक कृतीतूनच रुजले.
तो काळ असा होता, जेव्हा निवडणुका हे राजकीय बदलाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, याचे भान समाजाला यायचे. त्यामुळे निवडणूक हा एक उत्सव होऊन जायचा. रात्र-रात्र जाहीर सभा आणि प्रचारासाठी लाऊड स्पीकर लावलेली एखादी जीप गाडी एवढीच साधने असायची. ८०-९० च्या दशकापर्यंत सार्वजनिक फळ्यावर निवडणूक सभांची प्रसिद्धी व्हायची.
निवडणूक निकालाच्या दिवशी तर अशोक चौकातल्या फळ्यासमोर लोकांचे कोंडाळे पडायचे. रेडिओवरून मिळालेले सगळे तपशील सर्वपक्षीय कार्यकर्ते सार्वजनिक फळ्याच्या माध्यमातून हिरारीने लोकांपर्यंत पोहोचवत असत. ‘अमुक पुढे, तमुक मागे’ पडला, हा दमछाक करणारा खेळ कार्यकर्ते दिवसभर मनसोक्त खेळायचे. कोणत्या पक्षाला किती जागा हा फळ्यावरचा आकडा सारखा बदलत जायचा.
आज एक-एक सार्वजनिक फळा इतिहास जमा होत असताना, आम्हाला ‘सार्वजनिक’ करणारा हा सार्वजनिक फळा इतिहासाचा मोठा पट उलगडून डोळ्यासमोर उभा राहतो. जग गतिमान आहे. एका सार्वजनिक फळ्याची उपयोगिता किती काळची? परंतु प्रत्येक काळात, माणसाच्या सार्वजनिक सहभागाने निर्माण केलेल्या साधनांनी छोटे-छोटे बदल घडविले आहेत आणि आजचा समाज या कृतीवर उभा आहे.
आजही मी नवीन नगर रोडवर अभिनव मंडळांनी लावलेला सार्वजनिक फळा पाहतो आणि त्यावर दररोज लिहिलेला सुविचार वाचतो, तेव्हा विचार करतो हा सुविचार लिहिणाऱ्या त्या निवृत्त शिक्षिकेला कुठल्या सामाजिक उत्तरदायित्वाची भावना पूर्ण करायची आहे?
संवाद आणि संपर्क ही मानवी जीवनातील अपरिहार्य गरज आहे. आधुनिक संपर्क साधने देश-काळाच्या सीमा ओलांडून संपर्क साधू शकतात. इंटरनेट आणि व्हॉट्स अँपने तर माणसाला खिळवून ठेवले आहे. व्हॉट्स ॲपने सुसंघटितरित्या सर्व सामाजिक अंगांना वेठीस धरून समाजातील सर्व स्तरातील माणसांना आभासी जगात वावरायला भाग पाडले आहे. हा हल्ला एवढा तीव्र आहे की, एक पिढीच्या पिढीने आपले मूलभूत प्रश्न, कौशल्ये आणि क्षमता विकसित करणारे सर्व पर्याय विचार कक्षेबाहेर टाकले आहेत. ती निव्वळ ‘अस्मितेच्या’ लाटेवर आरूढ होऊन बेफाम उन्मादी आवेशाने गुरफटून गेली असून, आनंदी स्वार्थाचे आणि सौहार्दाचे जगणे विसरून जात आहे.
एका इतिहासाची गोष्ट: सार्वजनिक फळा
लेखक विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष व पंढरपूरच्या संत विचार पिठाचे विश्वस्त आहेत






भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक बोलक्या फळ्यांचे स्थान खूप महत्त्वाचे होते.
खंडोबा मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीला लागून तसेच मेनरोडवर
निवडणूक निकालाच्या दिवशी तर अशोक चौकातल्या फळ्यासमोर लोकांचे कोंडाळे पडायचे.