

संगमनेर – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संपूर्ण युवकांना मोठे आकर्षण आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही युवक भरकटले आहेत. यापुढे जातिभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका. उमाजी नाईक यांचा वारसा आपल्याला आहे, त्यामुळे एकजुटीने काम करून संगमनेरचा नावलौकिक वाढवावा. रामोशी समाजाने नेहमीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहावे, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे आवाहन ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी केले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीत ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, महेश गोफने, मनोज चव्हाण, रोशन चव्हाण, देवराम गुळवे आदींसह सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनेता सुरज चव्हाण म्हणाले की, माझ्यासारख्या गरीब मुलाला ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची संधी मिळाली. कलेच्या जीवावर आज राज्यात मला मोठा मान-सन्मान मिळतो आहे. लातूर आणि संगमनेरचे प्रेम मोठे आहे. रितेश देशमुख यांच्यामुळे मला बाळासाहेब थोरात कळाले. थोरात यांनी संगमनेरचे नाव देशात पोहोचवले असून, त्यांच्यामुळे झालेला येथील विकास हा नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. संगमनेर तालुका हा बारामतीसारखा विकसित आहे, असे ऐकले होते. पण प्रत्यक्षात येथील विकास पाहून तो महाराष्ट्राला दिशा देणारा असल्याचे जाणवले.
डॉ. जयश्री थोरात यांनी सुरज चव्हाण यांच्या संघर्षाचे कौतुक करत, बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी तालुक्यातील गोरगरिबांना कायम संधी दिली आहे. तालुक्यात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम आता युवकांना करायचे आहे, असे स्पष्ट केले.
आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले की, ब्रिटिश वृत्तीचे लोक समाजामध्ये फूट पाडून तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यांना स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी काही घेणेदेणे नाही, कोणताही वारसा नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखा, असे आवाहन त्यांनी केले.
संगमनेरात ‘स्वरसम्राट बँड’च्या निनादात भव्य रॅली
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव समितीच्यावतीने संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते यशोधन कार्यालय अशी भव्य रॅली संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि संगमनेर बसस्थानकापासून निघालेल्या या रॅलीत सिनेअभिनेता सुरज चव्हाण, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात सहभागी झाले होते. याप्रसंगी सटाणा येथील ‘स्वरसम्राट बँड’च्या निनादाने संगमनेर शहर दुमदुमले.


आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीत
अभिनेता सुरज चव्हाण म्हणाले की,
आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले की,