
संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांचे प्रत्येक गोष्टीवर किती बारीक लक्ष असते, याचे आणखी एक उदाहरण संगमनेरकरांना पाहायला मिळाले आहे. शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली, कारवाईत जप्त केलेली वाहने हटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी ही वाहने काढण्यात आली.
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयासमोरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे याच ठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने जमून जयंती, महापरिनिर्वाण दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, वर्षानुवर्षे पडून असलेल्या या जप्त वाहनांमुळे कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच, हा परिसर नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने वाहतुकीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही वाहने दुसरीकडे हलवणे गरजेचे होते.

नागरिकांची ही अडचण आणि सार्वजनिक जागेचा प्रश्न लक्षात येताच, अभ्यासू आमदार सत्यजीत तांबे यांनी तातडीने पाऊल उचलले. त्यांनी 3 ऑक्टोबर 2025 रोजी संबंधित विभाग ज्यांच्या नेतृत्वात येतो, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली.
सत्यजीत तांबेच्या या लोकहिताच्या मागणीची दखल उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ घेतली. केवळ पाच दिवसांतच, म्हणजेच आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी, या मागणीवर तत्काळ कार्यवाही झाली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांना जप्त वाहनांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केवळ पाच दिवसांच्या आत सार्वजनिक हिताच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याची यात तत्परता दिसून येते. या निर्णयामुळे आता संगमनेरातील नागरिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना महामानवांच्या पुतळ्यासमोर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. तांबे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या बारकाईने लक्ष देण्याच्या आणि तत्परतेने काम करण्याच्या ‘पॅटर्न’ची आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.

